श्री ज्ञानेश्वरी. By-Nilesh Konde-Deshmukh

मो.नं.९८९००१३५२०
॥ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ 
    ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
            । संन्यासयोगः ।

अर्जुन उवाचः संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥

भावार्थ :- अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा , कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुनः कर्माचे अनुष्ठान करावे असेंहि तूच सांगतोस. या दोन्हीपैकी ( तुझ्या मताने) जे खरोखर श्रेयस्कर असेल ते एक मला निश्चित सांग.

मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचे बोलणें ।
एक होय तरी अंतःकरणे । विचारूं ये ॥ १ ॥

मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, "अहो ! हे असे कसे तुमचे बोलणे ? तुम्ही एकच मार्ग सांगाल , तर त्यासंबंधी मनाने कांही विचार करता येईल...

मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु ।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ॥ २ ॥

यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा , हे विविध प्रकारे सांगितले होते; परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देता ?

ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता ।
आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे ॥ ३ ॥

हे श्रीअनंता ! आपले असे दोन्ही मार्गाचे बोलणे ऐकून आम्हा अज्ञानी लोंकांच्या मनाला काही उलगडा होत नाही..

एकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे ।
हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥

ऐका. एका (सारभूत) तत्वाचा बोध करायचा असेल, तर ते एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्याने दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय ??

तरी याचिलागीं तुमतें । म्यां राऊळासी विनविले होते ।
जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥

याकरताच आपल्यासारख्या श्रेष्ठयानां मी विनंती केली होती की, परमार्थ हा गूढ अर्थाने सांगू नका ..

परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा ।
सांगे दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥ ६ ॥

पण देवा ! मागील गोष्ट राहू दे. आता प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी कोणता मार्ग चांगला आहे, हे स्पष्ट करून सांगावे..

जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा ।
आणि अनुष्ठिता प्रांजळा । सावियाचि ॥ ७ ॥

जो मार्ग परिणामी अमृतमधुर आहे, ज्याचे फळ अचूक प्राप्त होते आणि जो आचरण करण्यास सहजच सरळ आहे,


जैसें निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोकासनां सांगडे । सोहपें होय ॥ ८ ॥

निद्रेचे सुख मध्येच भंग न पावता रस्ता तर पार करता आला पाहिजे, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा असेल, तो मार्ग मला सांगावा..


येणें अर्जुनाचेनि बोले । देवो मनीं रिझले ।
मग होईल ऐकें म्हणितले । संतोषोनियां ॥ ९ ॥

असे अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाच्या मनात प्रसन्नता तरारली आणि परम संतोषाने ते अर्जुनास म्हणाले , तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल...

देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये ।
तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥ १० ॥

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात , पाहा, ज्या दैववानाला (सुदैवाने ज्याला) कामधेनुसारखी आई लाभली आहे, त्याला आकाशातील चंद्रदेखील खेळायला मिळतो.

卐 "वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरूम" 卐

nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520

राम कृष्ण हरी 🚩🚩

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh